
(शंकर महाकाली महाराष्ट्र प्रतिनिधि)
मुंबई : आघाडीची पुढची रणनिती काय असेल. आघाडीने शिवसेनेसोबत जात सत्तास्थापन करायची की नाही याबाबतचे सगळे निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेतील, असं सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे. राज्यात सत्तास्थापनेवरून युतीत वाद सुरू आहेत. अशात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सरकार स्थापन करतील, अशा चर्चा घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सत्ता स्थापनेबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर शरद पवारांसोबत चर्चा करा. त्यांच्या सल्ल्यानेच पुढे चला, असा सल्ला सोनिया गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसात दोन वेळा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
