15 May 2026, Fri

अतिक्रमण धारण शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई द्यावी

माजी आमदार सुदर्शन निमकर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडे मागणी

राजुरा- ऑक्टोंबर महिन्यात आलेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतपिक सोयाबीन, कापूस, धान, ज्वारी व यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातात असलेले पीक निसर्गाच्या अस्मानी संकटाने हातून गेलेले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले असून सर्वेक्षण सुरू आहे. परंतु हे सर्वेक्षण ज्यांच्या मालकीची शेती व पट्टे आहे अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जे भूमिहीन शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्याकरिता सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून पोटाची खळगी भरत आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची अत्यंत आवश्यकता आहे कारण अधिक्रमण धारक शेतकरी सुद्धा शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करीत असतो व तेवढीच मेहनत करीत असतो मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हे सर्व पाण्यात गेली आहे. अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी पट्टे मिळण्यासाठी केलेले प्रस्ताव संबंधित विभागाकडे अजूनही प्रलंबित आहेत. अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई न मिळाल्यास त्यांच्यावर अन्याय होणार असल्यामुळे ही बाब दि.०३/११/२०१९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुंबई येथे भेटून आर्थिक मदत मिळण्यासंबंधीचे निवेदन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिले असून यासंबंधी प्रधान मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव महसूल व वन विभाग व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उचित कारवाईस्तव देण्यात आलेले आहेत. अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेली मागणी अत्यंत रास्त असून या संबंधाने शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *