
अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येते. दरम्यान, आपल्याला फक्त राज्य मंत्रीपद मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीस मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत पदार्पण केले. त्यानंतर ते शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते. आणि त्यानंतर आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रीपद देऊन औरंगाबादमधील पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याची समजूत काढण्याकरिता शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आत्ता दाखल झाले आहेत.
अब्दुल सत्तार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकट मानले जातात. तसेच, औरंगाबादमधील जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या समीकरणावरून ते भाजपच्या जवळ असल्याच्या चर्चांना आत्ता उधाण आले आहे.
